AJ 24taas news Maharashtra/अनिल जगताप पत्रकार टेंभुर्णी मोबाईल नंबर 9921581001
संत हे आईप्रमाणे उदार असून ते आईपेक्षाही श्रेष्ठ असतात. आई आपल्या लेकरावर प्रेम करते, तर संत विश्वातील सर्वांवर समान प्रेम करतात. अंधश्रद्धेचा पगडा दूर करून समाजात श्रद्धेचा मार्ग रुजविण्याचे महान कार्य संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी केले, असे मत युवा कीर्तनकार ॲड. कु. प्राची सरवदे यांनी व्यक्त केले.
माढा तालुक्यातील भुईंजे येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर येथे संत रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
पुढे मार्गदर्शन करताना ॲड. प्राची सरवदे म्हणाल्या की, संत रविदास महाराजांनी अंधश्रद्धेचा मार्ग मोडून काढत समाजाला श्रद्धेचा, विवेकाचा आणि मानवतेचा मार्ग दाखविला. सर्व संतांनी मन निर्मळ करण्याचा मार्ग समाजासमोर ठेवला आहे. अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय खरा परमार्थ घडत नाही. त्यामुळे प्रत्येकाने संतांच्या विचारांचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
चंदनाप्रमाणे संतांमध्ये सुगंधी गुण असतात. कुटुंबात एकी असेल तर घरात समाधान नांदते. गुरूचा आशीर्वाद मस्तकावर असल्यास जीवनातील खडतर प्रवासही सुखकारक होतो. वित्तबळ व ज्ञानबळ यांच्यासोबत शरीरबळही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत रविदास महाराज मंदिरचे ट्रस्टी राजाभाऊ शिंदे यांनी प्रास्ताविक, अरदास व आरती केली. जयंतीनिमित्त लंगर वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येऊन ते यशस्वीरीत्या पार पडले.
यावेळी चंद्रकांत कांबळे, प्राचार्य रोहिदास सोनवणे, अमित शिंदे, रामभाऊ भगत, मधुकर भगत, भगवान खरात, किरण लोंढे, अमर पवार, देविदास जाधव, अजिनाथ कांबळे, बाळासो गवळी, तानाजी पवार, संदीप कांबळे, कानिफनाथ आयरे, शंकर तुपसमुद्रे, निवृत्ती शिंदे, दत्तात्रय मस्तुद, पांडुरंग कांबळे, शोभा शिंदे, तनुजा शिंदे, सुवर्णा पवार, शैला पवार, रोहिणी पवार, शोभा कांबळे, अशोक शेलार, अश्विनी लोंढे, राधा तुपसमुद्रे यांच्यासह परिसरातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.





