AJ 24taas news Maharashtra हरिश्चंद्र गाडेकर सर टेंभुर्णी
*********************************
उजनी जलाशयातून सीना–माढा सिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्याचे आदेश आमदार अभिजीत पाटील यांनी कार्यकारी अभियंता सुचित्रा डुंबरे यांना दिले आहेत. या योजनेतून पाणी सोडण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
पावसाळा संपून तीन महिने उलटून गेल्याने सीना–माढा सिंचन योजनेच्या ४० हजार एकर लाभ क्षेत्रातील तलाव, विहिरी व बोरवेल्समधील पाणी मोठ्या प्रमाणात आटले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, बाजरी, कडधान्ये, भुईमूग, चारा, वैरण, ऊस तसेच फळबागांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.
याशिवाय या परिसरातील नागरिक व पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे सीना–माढा सिंचन योजना तातडीने सुरू करून ४० हजार एकर क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांच्या उभ्या पिकांचे नुकसान टाळणे आवश्यक आहे, असे आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी सांगितले.





