aj24taas news Maharashtra
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून माढा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध गणांतील एकूण आठ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संबंधित गणांतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
छाननीदरम्यान पंचायत समिती गणातील काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. मात्र कागदपत्रांतील त्रुटी, अर्जातील विसंगती व निवडणूक नियमांची पूर्तता न झाल्यामुळे काही अर्ज बाद करण्यात आले.
राजणी गणात सोनाली संदीप माने यांनी दाखल केलेल्या दोन अपक्ष अर्जांपैकी एक अर्ज मंजूर करण्यात आला असून एक अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
टेंभुर्णी गणातून जयश्री सुर्यकांत खरात यांचा वंचित बहुजन आघाडीचा अर्ज वैध ठरवण्यात आला असून त्यांचा अपक्ष अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
बेंबळे गणातून विष्णू हंबे यांचा भारतीय जनता पक्षाचा अर्ज मंजूर करण्यात आला असून अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
अकोले खुर्द गणातून बाबुराव शिरसागर यांनी दाखल केलेल्या दोन अपक्ष अर्जांपैकी एक अर्ज मंजूर तर एक अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद गटातील सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंचायत समितीतील अर्ज नामंजुरीमुळे काही गणांमध्ये थेट लढतीचे चित्र स्पष्ट होत असून पुढील काळात प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.





