भीमानगर / प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर
उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने भीमा–सीना जोड कालवा (बोगदा) उद्या सकाळपासून सिंचनासाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या गरजेनुसार कालव्यातून गरज तेवढेच पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे.
यासंदर्भात उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता एस. यू. दुम्ब्रे यांनी सर्व संबंधित यंत्रणा, प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कालवा परिसरात कोणतीही दुर्घटना किंवा नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भीमा–सीना जोड कालवा सुरू झाल्यामुळे संबंधित भागातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असून, रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, पाणी सोडले जात असताना नागरिकांनी व शेतकऱ्यांनी कालवा परिसरात विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





